पुणे: (15th Indian Student Parliament) संसदेत जातांना कुठल्याही पक्षाचे नाही तर जनसामन्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे संसदेचे पावित्र्य राखावे. या ठिकाणी विवेक, संयम, तर्क-वितर्क, समस्यांच्या मुद्यांवर चर्चा असावी व ती खेळ भावना असावी. विधिमंडळासाठी एक ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’ असावा. ज्यामुळे प्रत्येक राज्यातील कामगिरी पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. ज्यांचे मूल्यांकन ही ठोस निष्कर्षावर व्हावे., असे मत दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांनी व्यक्त केले. संसदेत संवाद, संस्कृती बळकट करण्यासाठी विधायक चर्चा आणि परस्पर आदर सन्मान आवश्यक असावे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे (MIT World Peace University Pune) आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय १५व्या ‘भारतीय छात्र संसदेच्या’ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे (MIT World Peace University Pune) अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह, वरिष्ठ पत्रकार व लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथील हवामान बदल व्यवस्थापनाचे प्रा. वॉल्टर लील फिल्हो हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे (MIT World Peace University Pune) कार्याध्यक्ष डॉ.राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, विद्यार्थी प्रतिनिधी सुमित खैरे, पायल झा, निखिल मिश्रा आणि अक्षिता सक्सेना उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात ’बेल ऑफ डेमोक्रसी’चा घंटानाद केला.
विजेंदर गुप्ता म्हणाले, “राजकारण आणि खेळ हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. संसदेमध्ये देशाचा विकास, परंपरा आणि भविष्य निर्मितीवर चर्चा व्हावी. खेळा मध्ये जसे देशाच्या झेंड्यासाठी खेळले जाते तसेच, राजकारणांनी यासाठीच कार्य करावे. लोकशाही हे पवित्र मंदिर आहे. येथे झालेले समाधान संपूर्ण समाजासाठी असते. दुर्देवाने आज राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. माध्यमांचीही जबाबदारी आहे की त्यांनी केवळ गोंधळ दाखवण्याऐवजी मुद्यांवरील चर्चेला प्राधान्य द्यावे.”
दिग्विजय सिंह म्हणाले, “राजकारणात ५६ इंच छाती नाही तर गरीब, पिडीत लोकांची सेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रवाद म्हणजे द्वेष नव्हे, मी मुख्यमंत्री असतांना कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी द्वेषाचे राजकारण केले नाही. आताचे राजकारण हे द्वेषाचे आणि शत्रुत्वाचे आहे. राजकारणात खेळाडू वृत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत, धर्म जात नंतर आहे, कोणालाही देशद्रोही किंवा देशभक्त ठरवण्याचा अधिकार नाही. लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्याला संविधान वाचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
पद्मश्री राजदीप सरदेसाई म्हणाले,“ राजकारणात स्पर्धा असली तर ती खेळातील स्पर्धेसारखी असावी नियमबद्ध, सन्मानपूर्वक आणि पराभव स्वीकारण्याची तयारी असावी. देशातील सर्वात मोठी समस्या निर्माण झाल्यावर जो समोर येतो तोच खरा नेता असतो. निष्ठा आणि कष्ट केल्यानेच नव भारत निर्माण होऊ शकतो. राजकारण आणि खेळात शिस्त महत्वाची असून स्पोर्टस ऑफ स्पिरिट अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “जगात भरपूर तणाव आणि अशांतता आहे. अशावेळी जगातील देशांचे लक्ष आपल्या भारताकडे लागले आहे. भारताला विश्वगुरू होण्यासाठी आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. वसुधैव कुुटुंम्बकम च्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतता निर्माण होऊ शकते.
डॉ. राहुल कराड म्हणाले,“ या संसदेच्या माध्यमातून लोकशाहीचे बळकटीकरण होत असून, समाजामध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. राजकारण दिसते तेवढे सोपे नाही. त्यामध्ये राजकारणी लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. राजकारणात उच्च शिक्षित युवा प्रतिनिधी यायला हवे, या उद्देशाने छात्र संसदेची सुरुवात झाली आहे.
यानंतर प्रा. वाल्टर लील फिल्हो यांनी शाश्वत विकासावर विचार व्यक्त केले.
तसेच पूर्व केंद्रीय मंत्री शिवराज पाटील आणि पद्मश्री मार्क टुली यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.




















1 Comment